श्री धावीर महाराजांना पोलिसांची मानवंदना
By admin | Published: October 13, 2016 04:06 AM2016-10-13T04:06:08+5:302016-10-13T04:06:08+5:30
रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
रोहा : रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तत्पूर्वी रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.
पालखी सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर विविधरंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे हा सलामी सोहळा आपल्या नजरेत टिपण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. गोंधळ्यांची आरती, संबळ वाद्य, घंटानाद आणि नगाऱ्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. तद्नंतर ढोल-ताशांच्या गजरात मार्गस्थ झालेली महाराजांची पालखी ग्रामस्थांना दर्शन देत दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतते. यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सडा-रांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात आल्ोली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते. हा रोहेकरांसाठी एक कौटुुंबिक, धार्मिक सोहळाच असतो. रोह्यात पालखीच्या दर्शनासााठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. येथील आशीर्वाद मंडळातर्फेगेली अनेक वर्षे भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली जात आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. अवधुत तटकरे, नगराध्यक्ष समीर शेडगे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता जगताप, विश्वस्त नितीन परब, विजयराव मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)