ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा; काेराेनाच्या दहशतीने प्रवास करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 23:33 IST2020-11-11T23:33:36+5:302020-11-11T23:33:42+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत.

ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा; काेराेनाच्या दहशतीने प्रवास करण्यास नकार
- आविष्कार देसाई
रायगड : काेराेनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून टाकली आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांचे व्यवसाय पूर्णतः बंद हाेऊन राेजगार बुडाला. त्याचप्रमाणे, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यांची चाकही अर्थचक्राच्या गाळात रुतुन बसली हाेती. तिकीट दरामध्ये काेणतीही वाढ केलेली नाही. मात्र, प्रवास करण्यास नागरिक अद्यापही घाबरत असल्याने कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. मात्र, धार्मिक मंदिर अद्यापही उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्याचप्रमाणे, लग्नसराईही सुरू झाली नसल्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याचा व्यवसाय घाट्यामध्ये चालला आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी नागरिक बाहेर फिरण्यास घाबरत आहेत. त्यामुळे सहलींचे बुकिंग मिळालेले नाही. लग्न सराईला सुरुवात झाल्यास व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात हाेईल. डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असतानाही तिकीटदरामध्ये काेणतीही वाढ या खासगी कंपन्यांनी केलेली नसल्याचे सांगितले.
काेराेनाचा कहर कमी झाला आहे, परंतु काेराेना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रवास करायला जाण्यासाठी मनामध्ये भीतीचे सावट असते. दिवाळीच्या कालावधीत नातेवाइकांकडे जाण्याचा विचार करत आहाेत. दिवाळीमध्ये काेराेनाचा कहर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे अधिक भीती वाटत आहे. - प्रवीण पाटील, प्रवासी