मुलींनीच जन्मदात्यांना संपवलं... रायगडमध्ये दोन महिलांच्या हत्या प्रकरणाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:35 AM2024-09-18T10:35:34+5:302024-09-18T10:41:41+5:30

रायगड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात मुलींनीच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Two different cases in Raigad q2 mother was killed by the girls themselves | मुलींनीच जन्मदात्यांना संपवलं... रायगडमध्ये दोन महिलांच्या हत्या प्रकरणाने खळबळ

मुलींनीच जन्मदात्यांना संपवलं... रायगडमध्ये दोन महिलांच्या हत्या प्रकरणाने खळबळ

Crime News : महाराष्ट्रात दोन हादरवून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. राज्यात दोन मुलींनीच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्या धक्कादायक प्रकार घडला. कुठे प्रेम प्रकरणातून तर कुठे संपत्तीच्या वादातून या दोन हत्येच्या घटना घडल्या. आईची हत्या करणाऱ्या मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही घटना या रायगड जिल्ह्यातील असल्याचे समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यात १० ते १३ सप्टेंबर दरम्यान या दोन्ही घटना घडल्या असून दोन मुलींना स्वतंत्र खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत प्रियकरासोबत अश्लिल चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा दाबून खून केला होता. ही धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात घडली. हत्येनंतर आईने आत्महत्या केल्याचा बनाव मुलगी आणि तिच्या प्रियकराने केला होता. मात्र, दुसऱ्या मुलीने तो बनाव उघड केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली.

१० सप्टेंबर रोजी संगीता झोरे (४२) यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यांची हत्या मुलगी भारती झोरे (२०) आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर या दोघांनी केली. संगीता यांनी पहाटे आपल्या मुलीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर भारतीने तिचा प्रियकर संतोषसोबत आईचा जीव घेतला. भारतीने आईचे हात-पाय पकडून ठेवले आणि संतोषने ब्लँकेटने संगीता यांचा गळा आवळून खून केला. यानंतर दोघांनी मिळून मृतदेह छताच्या पाईपला लटकवला. त्यानंतर संगीता यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र भारतीच्या धाकट्या बहिणीने ही संपूर्ण घटना गुपचूप पाहिली होती. या घटनेनंतर तीन दिवसांनी तिने याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. यानंतर खालापूर पोलिसांनी भारती आणि संतोषला अटक केली.

दुसरी घटना ही १३ सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये घडली. प्रिया नाईक नावाच्या महिलेचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला होता. त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत होता. मृत प्रिया नाईक यांनी जीव वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला असल्याचे शवविच्छेदनातून समोर आलं आहे. दोरीसारख्या वस्तूने गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर नातेवाईकांची चौकशी सुरू केली असता मुलीनेच आईच्या हत्येची सुपारी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं.

पनवेल शहर पोलिसांनी प्रिया नाईक यांची हत्या करणाऱ्या प्रणिता, विवेक पाटील व निशांत पांडे या तिघांना अटक केली आहे. आईकडून बाहेर फिरण्यासाठी तसेच मोबाईल वापरण्यासाठी निर्बंध येत असल्याने प्रणितानेच वैतागून आपल्या आईची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. प्रणिताचे पतीसोबत पटत नसल्याने ती गेल्या वर्षभरापासून माहेरी पनवेल येथे राहत आहे. यादरम्यान, प्रणिताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुद्धा निर्माण झाले आणि काही कारणामुळे  तुटले होते. त्यामुळे प्रिया नाईक यांनी प्रणिताच्या बाहेर येण्याजाण्यावर, फोनवरून बोलण्यावर बंधने घातली होती. आईकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रणिता वैतागली होती. त्यानंतर प्रणिताने मानलेला भाऊ आरोपी विवेक पाटील याला १० लाखांची आईच्या हत्येची सुपारी दिली. विवेकने त्याचा मित्र निशांत पांडे याच्या मदतीने १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरात कोणी नसताना प्रिया नाईक यांचा वायरने गळा आवळून खून केला.
 

Web Title: Two different cases in Raigad q2 mother was killed by the girls themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.