आष्टा : आष्टा येथील चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त नागरिकांचे सात-बारा तातडीने करण्यात यावेत, वारणा धरणग्रस्त संकलनातून नाव कमी करून चांदोली अभयारण्य संकलन धरून वन खात्याकडून अनुदान मिळावे, अशी मागणी मारुती गणू रेवले यांच्यासह खातेदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पुनर्वसन खात्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मूळ गाव पेटलोंड वसाहतीतील खातेदारांना १९८६ ते १९९९ पर्यंत प्लॉट वाटप करून त्याप्रमाणे पुनर्वसन करून आदेशाप्रमाणे दाखले दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वजण घरकुल बांधून वास्तव्य करीत आहेत. महसूल व पुनर्वसन खात्याने वेळोवेळी पाहणी केली आहे; मात्र अडचणीमुळे २५ खातेदारांचे सात-बारा झाले. १४ खातेदारांची सात-बारा झालेले नाहीत. मारुती पाटील, बाबूराव अनुसे, भागुजी अनुसे, गंगाराम अनुसे, सईबाई सावंत, दगडू रेवले, सीताराम घोलप यांची सात-बारा नोंद झालेली नाही. मारुती येवले-पाटील यांना १९९९ मध्ये संकलन तयार करून त्यांची कुटुंब संख्या आठ धरून सहा गुंठे प्लॉट व पाच एकर जमीन दिली. त्यानंतर २०१४ मध्ये एक व्यक्ती कमी करून देयक कमी करत आहेत. १९९९ च्या आदेशाप्रमाणे संकलन दुरुस्त करून सात-बारा मिळावा. तसेच काही खातेदारांची खाती वारणा धरणाच्या संकलनमधून कमी करून चांदोली अभयारण्याच्या संकलनमध्ये नोंद करण्यात यावीत, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.