टाकळी : खटाव (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या विलगीकरण कक्षातून एक रुग्णाने पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. खटाव आपत्ती व्यवस्थापन समितीकडून या रुग्णाची शोधाशोध करण्यासाठी धावपळ सुरू होती.
खटावमध्ये ३७ कोरोना रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी चार जणांना खटाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. केवळ एक दिवसापूर्वी ठेवण्यात आलेल्या या रुग्णाने विलगीकरण कक्षातून पलायन केले. पलायन केलेल्या रुग्णास शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची धावपळ सुरू होती. खटावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण संख्या कमी व्हावी, यासाठी विलगीकरण कक्षाची सुरुवात केली आहे. मात्र, विलगीकरण कक्षातूनच रुग्णांचे पलायन होत असल्याने खटावमध्ये रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विलगीकरण कक्षाबाहेर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पलायन केलेल्या रुग्णावर आपत्ती व्यवस्थापन समिती काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.