गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील बावची-गोटखिंडी रस्त्यावर पाटील वस्तीवरील शेतकरी उदय रामचंद्र पाटील (वय ४६, रा. बावची) हे सिंगल फेजची मोटर सुरू करण्यासाठी गेले असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरीतील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर १७ तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला.
उदय पाटील हे बावची-गोटखिंडी रस्त्यावरील वस्तीवर गेले होते. रविवारी सायंकाळी त्यांनी जनावरांच्या धारा काढल्या. शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ते सिंगल फेजची मोटर सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेले होते. बराच वेळ ते न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध सुरू केला. विहिरीवर पाहिले असता तेथे फक्त बॅटरीच मिळून आली. रात्रीच जीवरक्षक पथकाला पाचारण करून विहिरीत शाेध घेतला; पण रात्रीची वेळ असल्याने शाेधकार्यात अडथळे येऊ लागले. सोमवारी सकाळपासून जनरेटर, इंजिनवर चार विद्युत मोटरी सुरू करून विहिरीतील पाणी उपसा करण्यात आला. सहा तासांच्या परिश्रमानंतर विहिरीतील गाळात रुतलेला उदय पाटील यांचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. या घटनेची नोंद आष्टा पोलिसांत झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
फाेटो : २५ गाेटखिंडी १
बावची-गोटखिंडी रस्त्याच्या विहिरीत पडून शेतकरी उदय पाटील यांचा मृत्यू झाला.
फाेटाे : २५ उदय पाटील (सिंगल)