जुलै महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे वारणा काठासह वाळवा तालुक्यातील ९८ गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. यामध्ये ४३ हजार शेतकऱ्यांचे १४.३१३ हेक्टर क्षेत्रांमधील सोयाबीन, ज्वारी, मका, भात, भाजीपाला, फळपिके अशा विविध पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून ५४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची मागणी केली; पण प्रत्यक्षात आजवर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
वारणा काठावरील ऐतवडे खुर्द येथे ११५० हेक्टर क्षेत्र असून, पुराच्या पाण्याने ८५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे आहेत, शिवाय ८४० घरांमध्ये पाणी शिरले हाेते. १५० घरांची पडझड झाली आहे. पंचनामे होऊन महिना उलटला तरीही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट
एकही पूरग्रस्त मदतीविना उपेक्षित राहणार नाही : सबनीस
वाळवा तालुक्यातील एकही पूरग्रस्त मदतीविना उपेक्षित राहणार नाही. तालुक्यातील अनेक पूरग्रस्त कुटुंबांना दहा हजार रुपयांप्रमाणे बँक खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित ऐतवडे खुर्द, वाळवा, बोरगाव अशी वंचित गावे तांत्रिक अडचणीमुळे राहिली होती. या वंचित गावातील पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर येत्या चार दिवसांत पैसे जमा होतील, अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.