सांगली : म्हैसाळ योजनेचे बिल भरायला सरकारने पैशाचा छापखाना टाकला आहे का?, असे विधान आठ दिवसांपूर्वी करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार झाल्यानंतर, आता त्यांनी या प्रश्नावर बुधवार, दि. १७ रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव तालुक्यांना दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. तरीही वीज बिल थकल्याच्या कारणावरून म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी पिके, फळबागा वाळून चालल्या आहेत. यास काही प्रमाणात शेतकरीही जबाबदार आहेत. मात्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना सरकारने संवेदनशीलता दाखवून थकबाकीतील काही रक्कम टंचाई निधीतून भरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील यांनी म्हैसाळ योजनेचे वीज बिल टंचाईतून भरण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विविध संघटना आणि पक्षांनी त्यांचा निषेध केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि दि. २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील यांनी या प्रश्नावर दि. १७ रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस पाटील यांच्यासह ऊर्जामंत्री बावनकुळे, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
‘म्हैसाळ’बाबत पालकमंत्र्यांना जाग
By admin | Published: February 17, 2016 12:35 AM