अविनाश कोळी -- सांगली --सहकार विभागाच्या मोहिमेत सांगली जिल्ह्यातील तब्बल ५0५ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. पूर्वीच्या संस्थांसहीत आता अवसायनातील संस्थांची संख्या ९0४ इतकी झाली असून, त्याचा भार केवळ पन्नास अवसायकांवर आला आहे. लवकरच यातील जवळपास ३00 संस्थांची नोंदणी रद्द करून हा भार कमी करण्याच्या हालचाली सहकार विभागामार्फत सुरू आहेत. राज्य शासनाने सुरू केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील कागदोपत्री जिवंत असलेल्या सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण ७५९ सहकारी संस्था केवळ कागदोपत्री जिवंत असल्याचे दिसून आले. अनेक संस्था त्यांनी दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांमार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. सहकार विभागाच्या आदेशाप्रमाणे या सर्व बिनकामी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५0५ संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवसायकांच्याही नियुक्त्या सहकार विभागाने केल्या आहेत. यापूर्वीच्या ३९९ संस्थांच्या अवसायनाची जबाबदारीही सहकार विभागावर होती. एकूण पन्नास कर्मचाऱ्यांवर पूर्वीच्या आणि आताच्या अशा एकूण ९0४ संस्थांच्या अवसायनाचा भार पडला आहे. एकेका अवसायकाकडे २0 ते ३0 संस्थांचा भार आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ७५९ संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पूर्व अंतरिम, अंतरिम आणि अंतिम नोटिसा बजावून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधीही दिली होती. अंतिम मुदत संपुष्टात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात २६३ संस्था, तर अंतिम टप्प्यात पाचशेवर संस्था अवसायनात निघाल्या. सांगली जिल्ह्यातील बिनकामी सहकारी संस्थांचे पॅकअप् आता सुरू झाले आहे. सहकार विभागाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात सांगली जिल्ह्यात ७५९ संस्था बिनकामी आढळल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर यातील काही संस्थांनी आपले म्हणणे सादर केले होते. शासकीय अनुदानाअभावी संस्था रखडल्याचे यातील बहुतांश संस्थाचालकांनी सांगितले आहे. त्यामुळे सुनावणी सुरू असलेल्या या संस्था वगळता अन्य संस्थांच्या अवसायनाची प्रक्रिया सुरू झाली होती. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा केली होती. आता प्रत्यक्ष अवसायनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)असे झाले सर्वेक्षणजिल्ह्यात ४०८९ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी केवळ ३ हजार ३३० संस्थाच चालू स्थितीत आढळून आल्या. कागदोपत्री जिवंत असलेल्या संस्थांची संख्या ३१० आणि ठावठिकाणा नसलेल्या संस्थांची संख्या ४४९ इतकी आहे. सर्वेक्षणात बिनकामी आढळलेल्या सर्वाधिक संस्था मिरज तालुक्यात आढळून आल्या. नोंदणी रद्द : प्रक्रियेच्या हालचालीज्या संस्थांचा ठावठिकाणाही नाही, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रियाही आता सुरू झाली आहे. इस्लामपुरात ७५, शिराळ््यातील ३६, कवठेमहांकाळच्या सुमारे ३५ आणि मिरज तालुक्यातील २०९ सहकारी संस्थांच्या नोंदणी रद्दचे प्रस्ताव तयार होत आहेत. तीनशे संस्थांची नोंदणी रद्द झाली, तर अवसायकांवरील भार हलका होणार आहे. २५ ते ३० संस्थांचा भार १० ते १५ संस्थांपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे संस्थांच्या नोंदणी रद्दच्या प्रक्रियेला गती आली आहे. ८४ संस्था बंदमिरज तालुक्यातील १२१४ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ८११ संस्था चालू स्थितीत आढळल्या. ८४ बंद अवस्थेत, २३६ बिनकामी, तर जागेवर न सापडलेल्या ८३ संस्था होत्या.
पन्नास अवसायकांवर भार
By admin | Published: February 15, 2016 11:34 PM