कडेगाव : जनावरांसाठी शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. योजना बाळासोा घाडगे (वय ५०, रा. कडेगाव) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवार (दि. ९) रोजी सकाळी ११ वाजण्याच्यासुमारास घडली. या घटनेबाबत नगरपंचायतीचे कर्मचारी युवराज एकनाथ घाडगे (वय ४६) यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, योजना घाडगे या कडेगाव येथील साठेनगर येथील रहिवासी होत्या. त्या नियमित शेतात सकाळी वैरण आणण्यासाठी जात होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्या कडेगाव शिवाजीनगर येथील रस्त्यावरील शिरीष देसाई यांच्या शेतात जनावरांसाठी वैरण आणण्याकरिता गेल्या. दरम्यान, यावेळी त्यांना विद्युत विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.