पाटणमधील १४४ गावे : विविध उपाययोजना राबविण्यात आल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील आपत्तीचा सामना करण्यासाठी ग्रामीणस्तरावर ग्रामपंचायतीकडून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील ४६४ ग्रामपंचायती कोरोना मुक्त झाल्या आहेत. दरम्यान, पाटण तालुक्यातील सर्वाधिक १४४ गावे कोरोनामुक्त आहेत.
कोरोना उपाययोजना अंतर्गत ग्रामस्तरावर कोमोरबिड रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविणे, ग्राम दक्षता समितीच्या माध्यमातून गावातील आपत्तीजनक परिस्थितीवर दैनंदिन लक्ष देऊन त्यावर नियंत्रण ठेवणे. बाधित रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करून घेणे, गृहविलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणे, संस्थात्मक विलगीकरणमधील रुग्णांची काळजी घेणे, कोरोना नियमांचे पालन करायला लावणे, कलम १४४ ची यशस्वी अंमलबजावणी करणे आदी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
ब्रेक द चेन अंतर्गत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी असलेल्या मार्गदर्शक पद्धतींचा अवलंब केल्यामुळे जिल्ह्यातील ४६४ ग्रामपंचायतींना कोरोना विषाणू गावापासून हद्दपार करण्यात यश मिळाले आहे. ही गावे सद्यस्थितीत कोरोनामुक्त झालेली आहेत.
चौकट :
जावळी तालुक्यातील ५८ गावांचा समावेश...
सातारा तालुक्यातील ५१ गावे कोरोनामुक्त झालेली आहेत तर कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील प्रत्येकी ३१, माण तालुक्यातील १२, फलटण ६, खंडाळा तालुक्यातील ११ गावे मुक्त आहेत. त्याचबरोबर वाई तालुक्यातील २६, जावळी ५८, महाबळेश्वर तालुक्यातील ५२, कऱ्हाड ४३ व पाटण तालुक्यातील १४४ अशा एकूण ४६४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कोट :
जिल्ह्यात कोरोना स्थिती आहे. विविध उपाययोजना केल्याने जिल्ह्यातील ४६४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यातील इतर गावांनीही हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. तसेच आपली गावे सुद्धा लवकरच कोरोनामुक्त करावीत. तिसऱ्या लाटेसाठीही प्रतिबंधक उपाययोजना राबवून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
.........................................................................