वडूज : ‘भटके जीवन जगणाऱ्या धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने स्वत:च्या मैदानावर राज्यस्तरीय गजीनृत्य महोत्सव आयोजित करावा. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस व जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. संपूर्ण राज्यात ही परंपरा व्यापक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदारी स्वीकारेल,’ असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंंदे यांनी केले.सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व खटाव पंचायत समितीच्या वतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील पंचायत समितीच्या मैदानात आयोजित गजीनृत्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शेती सभापती शिवाजी शिंंदे, शिक्षण सभापती अमित कदम, समाजकल्याण सभापती मानसिंंगराव माळवे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना मोरे, पंचायत समितीचे उपसभापती धनाजी पावशे, प्रदीप विधाते, प्रा. बंडा गोडसे, जितेंद्र पवार, प्रा. अर्जुन खाडे, नंदकुमार मोरे, बाळासाहेब माने, गणेश शिंंदे उपस्थित होते.शिंंदे म्हणाले, ‘मेंढपाळ व्यवसायाबरोबरच भटका व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजाने आपली आवड जोपासण्यासाठी गजीनृत्य कला जोपासली आहे. धनगरस समाजासारख्या इतर उपेक्षित जाती जमाती, ओबीसी बारा बलुतेदार या समाजघटकांच्या विकासासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी महायुतीने धनगर समाजाची ङ्खफसवणूक केली आहे. सत्तेवर येताच त्यांना आता आरक्षणाचा विसर पडला आहे. त्यांना जाब विचारण्यासाठी समाजाने रस्त्यावर यावे. धनगर समाजाच्या कला विकासाबरोबरच समाजाचा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न करू. पवार यांनी ज्या पद्धतीने धनगर समाजाचे हित सांभाळले आहे, त्या हितसंबंधांना तडा न जाता आगामी काळात राष्ट्रवादीकडून असेच हितसंबंध जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. गजीनृत्य संमेलन भरविण्याची परंपरा सातारा जिल्ह्याने सुरू केली आहे, संपूर्ण राज्यात ही परंपरा व्यापक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदारी स्वीकारेल. गजीनृत्याबरोबरचस विविध पारंपरिक संस्कृतीतील क्रीडा प्रकार जोपासण्यासाठी प्रयत्न करू.’आ. घार्गे म्हणाले, ‘हुतात्म्यांच्या भूमीत महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीदिनी गजीनृत्य संमेलन होत आहे. ही बाब अतिशय अभिमानास्पद आहे. अशा प्रकारचे विधायक उपक्रम जिल्हा परिषद, पंचायत समितीने कायम राबवावेत. त्यांना चांगले सहकार्य केले जाईल.’ जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी भाषणात गजीनृत्य पथकातील ढोल वाजविणाऱ्या कलाकारांना मानधन देण्याची मागणी केली.प्रारंभी महात्मा जोतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आदी थोरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उद्घाटन समारंभानंतर आ. शिंंदे, आ. घार्गे, आदी मान्यवरांनी गजी मंडळात सहभाग घेऊन गजी मंडळाच्या ढोलाच्या तालावर हातात रूमाल धरून गजीनृत्यात सहभाग घेतला. मान्यवरांच्या या सहभागाने उपस्थित सर्वजणच भारावले होते.समाजाकल्याण सभापती मानसिंंगराव माळवे यांनी प्रास्ताविक केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष टी. आर. गारळे यांनी स्वागत केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सभापती प्रभावती चव्हाण यांनी आभार मानले.कार्यक्रमास समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, बाजार समितीचे सभापती सुुनील घोरपडे, उपसभापती अनिल माने, गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, हिंंदुराव गोडसे, चंद्रकांत पाटील, सुनील घोरपडे, अनिल माने, सी. एम. पाटील, तुकाराम यादव, बाबासाहेब दगडे, विजय काळे, राजेंद्र कचरे, मनिषा सिंंहासने, रंजना खुडे, सुमन माळवे आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)२७ डिसेंबरला धनगर समाजाचा आवाज दाखवा‘दि. २७ डिसेंबरला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सातारा येथे धनगर समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार घेण्याचे नियोजन आहे. यावेळी सर्व धनगर समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपले ढोल वाजवून सरकारला धनगर समाजाचा आवाज दाखवावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंंदे यांनी यावेळी केले.
गजीनृत्याची परंपरा संपूर्ण राज्यात राबवू
By admin | Published: November 29, 2015 11:38 PM