रामापूर : ‘छत्रपती शिवप्रभूंसमवेत स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या समाजातील अठरापगड जाती-धर्मातील वीर मावळ्यांचे कर्तृत्व हे महान आहेच. त्यांच्या कर्तृत्वाला आणि बलिदानाला न विसरता युवा पिढीने वीर मावळ्यांचे आचार, विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार ऊर्फ बकाजी निकम यांनी केले.
पाटण येथील नागोजीराव पाटणकर वाचनालयात नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, माजी सरपंच चंद्रकांत मोरे, यशवंतराव जगताप, आबासाहेब भोळे, विक्रांत कांबळे उपस्थित होते.
ग्रंथपाल संजय इंगवले म्हणाले, ‘मंदिराची सुंदरता ही केवळ मंदिराच्या कळसाकडे पाहिल्यावर लक्षात येत नाही तर मातीखाली दडलेल्या पायातील ज्या भक्कम पायरीवर ते मंदिर उभे आहे, त्या पायरीकडे पाहिल्यानंतरच त्याची सुंदरता, भव्यता लक्षात येते. त्याप्रमाणेच शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराजाची इमारतदेखील नेताजी, तानाजी, येसाजी, बाजी, जिवाजी, मुरारबाजी, कोंडाजी, शिवा काशीद यांच्यासारख्या मावळ्यांच्या बलिदानाच्या पायावरच उभी राहिली आहे. म्हणूनच आज शिवप्रभूंच्या कार्याइतकेच स्वराज्याच्या या शिलेदारांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण, चिंतन होणे खूप गरजेचे आहे.’
यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल संजय इंगवले यांनी स्वागत केले तर दत्तात्रय कवडे यांनी आभार मानले.
फोटो : 14 केआरडी 04
कॅप्शन : पाटण येथे बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेला चंद्रहार निकम, अमरसिंह पाटणकर, संजय इंगवले यांनी अभिवादन केले.