म्हसवड : ‘राज्यात आलेले भाजपाचे सरकार लोकशाही मार्गाने आले नाही, हे दाखविण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. मात्र न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती. यापुढे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहणार आहे. मी चुकीचे काही केले नव्हते. त्यामुळे निलंबन रद्द होणारच असा विश्वास होता,’ असे आमदार जयकुमार गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य सरकारच्या विश्वासदर्शक प्रक्रियेदरम्यान विधानभवन परिसरात राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच विधानसभा सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी हे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा युती सरकारने केली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.आमदार गोरेंचे निलंबन मागे घेतल्याचे समजताच माण-खटावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दहिवडी, म्हसवड, मार्डी, गोंदवले, वडूज, मायणी, कुरोलीसह गावोगावी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)
चुकलोच नाही म्हणून निलंबन मागे : गोरे
By admin | Published: December 23, 2014 10:32 PM