कऱ्हाड : येथील पालिकेने शहरात ठिकठिकाणी बसवलेली सिमेंटची बाकडी तुटली आहेत. बाकडी तुटल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय नाही. ही बाकडी तातडीने बदलण्याची मागणी होत आहे. काही बाकडी तुटल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
वेलींचा विळखा
कऱ्हाड : कऱ्हाड ते पुसेसावळी मार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकांना झुडूपांसह वेलींनी विळखा घातला आहे. त्यामुळे हे फलक असून अडचण, नसून खोळंबा बनले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने फलकांवर वाढलेली झुडूपे व वेली हटवावीत, अशी मागणी वाहन चालकांतून केली जात आहे.
गटर तुंबली
कऱ्हाड : शहरातील मंडई परिसरात असलेली गटारे सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी नाल्यांमधून प्रवाहीत झाले नाही. परिणामी मंडईत अनेक ठिकाणी तळे साचले होते. गटार तुंबल्याने परिसरात दुर्गंधीही पसरत असून, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
पुलावर अंधार
कऱ्हाड : शहरातील जुन्या कोयना पुलावर असलेले काही पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी या पुलाचा वापर करतात. मात्र, पुलावर अंधार असल्यामुळे रात्री पादचाऱ्यांना या पुलावरून मार्गस्थ होताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. संबंधित विभागाने पथदिव्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.