मायणी : पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग लि., पडळ या साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या तिसऱ्या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक करार व ऊस नोंदणीला संचालक विक्रम घोरपडे, प्रीती घार्गे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला कारखान्याचे प्रशासकीय व्यवस्थापक अमोल पाटील, टेक्निकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे, चीफ इंजिनिअर काकासाहेब महाडिक, चीफ केमिस्ट शिंदे, चीफ अकाऊंटंट अजित मोरे, तात्यासो पांढरे, प्रकाश घार्गे, मुख्य शेती अधिकारी किरण पवार, आदी उपस्थित होते.
यावेळी विक्रम घोरपडे म्हणाले, खटाव- माण कारखान्याच्या माध्यमातून या भागात औद्योगिक क्रांती झाली आहे. चालू वर्षाच्या गळीत हंगामाची सुरुवात तोडणी वाहतूक कराराने होत असते. आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जास्तीत जास्त कंत्राटदारांनी आपले तोडणी वाहतूक करार लवकरात लवकर करून घ्यावेत. तसेच तोडणीयोग्य असणाऱ्या ऊसाची व नवीन लागण ऊसाची नोंद कारखान्याच्या अधिकृत विभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी करुन घ्यावी. अमोल पाटील यांनी आभार मानले.