पाचगणी : काटवली, ता. जावळी येथे नदीकाठी झुडपात बेवारस घोड्याचा मृत्यू झाला. तीन दिवसांपासून मृतदेह पडून होता. मात्र प्रशासनाला याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून काटवली येथील कुडाळी नदीच्या शेजारी झुडपात एक घोडा बेवारस मरून पडला आहे. गावातील लोकांना माहीत असूनही याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्याने लक्ष कोणी घालायचे म्हणून सर्वच गप्प, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून निवांत आहेत. याचा फटका ग्रामस्थांना बसू शकतो. सध्या रोज संध्याकाळी पाऊस पडत आहे. लवकर या बेवारस घोड्याच्या मृतदेहाची विल्हेवाट न लावल्यास जंतुसंसर्ग फैलावण्याचा धोका संभवतो आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढीत गावाला रोगराईपासून दूर ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.