दहिवडी : कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून मोठी क्रांती होत आहे. त्या क्रांतीचे फलित म्हणजे तालुक्यातील पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी, दिवडी या गावांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. सुरुवातीला या गावांमध्ये साखळी सिमेंट बंधारे १७ ठिकाणी झाले. त्यानंतर शासनाने ‘जलयुक्त शिवार’ कल्पना मांडली. या चारही गावांतील चांगले लोक एकत्र आले. सर्वांनी मिळून ३५ ते ४० ठिकाणी मातीचे बंधारे उभे राहिले आणि ऐन दिवाळीत टँकरचे पाणी पिणारे गाव अक्षरश: स्वयंपूर्ण झाले व चारही गावांमध्ये किमान १५ मेपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. या गावाने डोंगरमाथ्यावर करोडो बियांचे टोकण केले. हनुमान विद्यालय निढळ, न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड व जिल्हा परिषद शाळा यांच्या सहकार्याने करंवद, साग, लिंब, करंज, सीताफळ या वृक्षांची लागवड केली आहे. दिवडी येथे ५० एकर क्षेत्रामध्ये वनराई निर्माण केली आहे. आंबा, नारळ यासह अनेक झाडे असून, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहे. वाहणारे पाणी जागीच खड्ड्यात साठवले आहे. डोंगराला चर काढून पाणी अडविल्याने स्वच्छ पाणी बंधाऱ्यामध्ये येत आहे. या कामात कोकणचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, कृषी विभाग, तहसीलदार यांनीही महत्त्वपूर्ण मदत केली आहे. गावात ३५ ते ४० बचतगट स्थापन झाले असून, अनेक राजकीय सामाजिक मंडळी या गावाला आवर्जून भेट देत असल्याने ग्रामस्थांचा लोकसहभाग दिवसेंदिवस वाढ आहे. (प्रतिनिधी)
माणमधील चार गावांमध्ये पाणीच पाणी !
By admin | Published: October 14, 2016 12:33 AM