लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राजपथावर वृक्षारोपण ही गोष्टच कालपर्यंत आश्चर्यकारक आणि काहींना हास्यास्पद वाटली असेल. पण हे चित्र अवघ्या तीन वर्षांत बदललं, अन् राजधानी शाहूनगरीतील ऐतिहासिक राजपथावर राज्यफूल असणारे जारूळ आणि बकुळसारख्या अस्सल स्थानिक प्रजातीच्या वृक्षांनी शोभा आणली. सदा वर्दळीच्या ठिकणी नियोजनबद्ध पद्धतीने केलेले वृक्षारोपण अनेकांना सावली देत आहे.
राजपथाच्या वैभवात भर घालणाऱ्या या उपक्रमात भवानी मंडळाचा मोलाचा सहभाग आहे. शासनाच्या अमृत योजनेंतर्गत सातारा शहरामध्ये सुमारे तीन हजारांहून अधिक झाडं लावण्याचा उपक्रम २००१६-१७ मध्ये सातारा नगरपालिकेने राबवला. या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील राजपथ, कर्मवीर पथ तसेच पोलीस परेड मैदान रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर व काही ठिकाणी खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गरम्य सातारा ही केवळ नगरपालिकेची नव्हे तर प्रत्येक सातारकराची जबाबदारी आहे, या जाणिवेतून देवी चौकातील श्री भवानी मंडळाने या उपक्रमामध्ये कृतिशील सहभाग नोंदवला.
मंडळाच्या सदस्यांनी राजपथावर जांभळी चौक ते देवी चौक या दरम्यानच्या वृक्षांच्या संगोपनाचे व्रत हाती घेतले. झाडांना मंडळाने स्वखचार्तून ट्री गार्ड बसवले. राजपथावर कधी झाडं राहील का, अशी सुरुवातीला थट्टाही झाली. पण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झाडांना पाणी देण्याचा दिनक्रम केला. त्याच्या छाटणीसाठी वेळोवेळी पालिकेकडे पाठपुरावा केला. या सर्वांचा परिपाक म्हणजे राजपथावरील जांभळी चौक ते देवी चौकदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा साधारण सात ते बारा फुटांपर्यंत वाढलेली २५ ते ३० हिरवीगार झाडं पाहायला मिळतात. राज्याचे फूल समजले जाणारे जारूळ व बकुळ या प्रजातीच्या झाडांनी चांगलीच धर पकडली आहे.
या संदर्भात भवानी पेठेतील व्यावसायिक व स्थानिक नागरिक अमरसिंह रांगोळे म्हणाले, प्रखर उन्हात एखादा वाटसरू घटकाभर त्या झाडाच्या सावलीत उभा राहतो, तेेव्हा त्याचं समाधान मोठं आहे. ही झाडं सर्वांनाच प्राणवायू पुरवतात. त्यांच्या अस्तित्वामुळे आपल्या शहराचं, परिसराचं तापमान कमी राखण्यास मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक सातारकरानं आपल्या दारात एक झाड लावून त्याचं संगोपन करावं.’
चौकट
दुकान झाकाळले जाऊ नये म्हणून काही ठिकाणी नागरिकांनी पालिकेची झाडचं नष्ट केली आहेत. याच्या अगदी उलट परिस्थिती या मार्गावर पाहायला मिळते. तुम्ही ग्राहकाला देत असलेली सेवा महत्त्वाची आहे. दुकानाची फ्रंट किंवा पाटी ही फक्त नावाच्या स्मरणासाठी असते. त्यामुळे झाडाचा आणि त्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याचा काहीही संबंध नाही, असेही मत येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोट
प्रत्येक सातारकराने जबाबदारी ओळखून आपल्या दारातील झाडाचे संगोपन केल्यास आपला सातारा निश्चितच हरित सातारा होण्यास वेळ लागणार नाही.
- सुजाता राजेमहाडिक, नगरसेविका, अध्यक्षा, भवानी मंडळ सातारा