मसूर : किवळ (ता. कऱ्हाड) येथे माॅन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. केवळ तीन तासांत ७० मिलिमीटर पाऊस झाला. सगळीकडे पाणी पाणी झाले होते. विजेच्या कडकडाटात वारा नसल्यामुळे शांत परंतु जोरदार पडलेल्या पावसाने ओढे-नाले तुडुंब भरून वाहिले. शेतात पाणी साचून त्याची तळी झाली. या पावसामुळे किमान आठ दिवस तरी खरीपपूर्व मशागतीच्या शेतामध्ये कोणतेही काम करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात होते. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की जणू काही ढगफुटी झाली आहे, असा किवळकरांना भास होत होता. हा पाऊस खरिपासाठी संजीवनी ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. दिवसभर वातावरणामध्ये प्रचंड उष्मा होता. त्यामुळे दुपारी चार वाजताच पावसाने हजेरी लावली. तो पाऊस सात ते आठ वाजेपर्यंत पडत होता.
०१मसूर-रेन
किवळ येथे मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. (छाया : जगन्नाथ कुंभार)