सातारा : सातारा जिल्ह्याची कोरोना परिस्थिती गंभीर वळणावर आली असताना जिल्हा प्रशासनाकडून चुकांची सातत्याने पुनरावृत्ती केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. या चुका अशाच होत राहिल्या तर कोरोनाची तिसरी लाट रोखणे अत्यंत जिकरीचे होऊ शकते.
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये सातारा जिल्हा सर्वात पुढे आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे मृतांचे प्रमाणही चिंतेची बाब बनली आहे. गतवर्षी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर नागरिक, व्यापारी, दुकानदार, वाहनधारक अशा सर्वांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले. प्रशासनानेदेखील ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला.
पहिल्या लाटेत जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर काम केले गेले. कोरोना रोखण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रशासन अशा उपाययोजना राबविण्यास कमी पडल्याने कोरोनाचा जिल्ह्यात विस्फोट झाला. आता तिसरी लाट जर थांबवायची असेल तर प्रशासनाने चुकांची पुनरावृत्ती करून चालणार नाही.
(पॉईंटर)
१. संचारबंदीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली आणि पुन्हा संक्रमण वाढले.
२. गृह अलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात होती. हे रुग्ण निर्बंध असतानाही घराबाहेर पडले.
३. कार्यक्रमांना बंदी असली तरी लपूनछपून लग्न सोहळा व कार्यक्रम होत राहिले. या गर्दीतून नागरिक कोरोना घरी घेऊन गेले.
४. जिल्हाबंदीचे निर्बंध कठोर नाहीत. कोणीही, केव्हाही, कुठूनही येऊ शकतो. तसेच येणाऱ्याची नोंदही ठेवली जात नाही.
५. गृहभेटीद्वारे नागरिकांचे सर्वेक्षण बंद करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्र नावापुरतेच करण्यात आले.
(चौकट)
पालिकेच्या दोन पथकांची असेल नजर
- संचारबंदी शिथील झाल्यानंतर शहरातील बारीकसारीक गोष्टींवर सातारा पालिकेकडून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी पालिकेने प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली आहेत.
- फिजिकल डिस्टन्स, बाजारपेठेतील गर्दी, मास्क न घालणारे नागरिक अशांवर या पथकाची करडी नजर असणार आहे.
- शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक हालचालींवर पथक लक्ष ठेवणार आहे. याशिवाय वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक केली जाणार आहे.
(पॉईंटर)
पहिला अनलॉक
दिनांक : ४ ऑगस्ट २०२०
एकूण कोरोना रुग्ण : ४,५६१
मृत्यू : १३९
(पॉईंटर)
दुसरा अनलॉक
दिनांक : १ जून २०२१
एकूण कोरोना रुग्ण : १,६७,७९२
मृत्यू : ३,६९८
फोटो : ०२ जावेद खान ०१
सातारा जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असले तरी नागरिक, वाहनधारक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.