‘जरंडेश्‍वर’ सुुरुवातीपासून न्यायालयीन कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:56 AM2021-07-02T07:56:43+5:302021-07-02T07:59:09+5:30

कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात मिळवण्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील यांचा १८ वर्षे लढा

‘Jarandeshwar’ has been in court controversy since the beginning, ajit pawar in trouble | ‘जरंडेश्‍वर’ सुुरुवातीपासून न्यायालयीन कचाट्यात

‘जरंडेश्‍वर’ सुुरुवातीपासून न्यायालयीन कचाट्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज देण्यास नकारघंटा वाजविल्याने त्यांनी इतर बँकांकडून कर्जे घेत कारखान्याची उभारणी केली.

साहिल शहा

कोरेगाव (जि.सातारा) : थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केलेल्या चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा नाममात्र किमतीत लिलाव करून मुंबईच्या गुरु कमोडिटीज कंपनीला विकला होता. बँकेने अन्यायकारक भूमिका घेत कारखाना आपल्याकडून हिसकावून घेतल्याचा आरोप करत कारखान्याच्या संस्थापिका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे अविरत लढा दिला आहे. विविध न्यायालयांमध्ये त्यांनी धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना परत मिळवायचाच, असा चंग त्यांनी या वयातसुद्धा बांधला आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भागभांडवल उभारत चिमणगावच्या माळावर १९९९ मध्ये साखर कारखाना उभा केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज देण्यास नकारघंटा वाजविल्याने त्यांनी इतर बँकांकडून कर्जे घेत कारखान्याची उभारणी केली. मात्र, पहिल्याच गळीत हंगामापासून कारखाना अडचणीत गेला. कामगारांसह अन्य लोकांच्या नावावर वित्तीय संस्थांकडून कर्जे उचलल्याने दरवर्षी कारखान्याची आर्थिक घडी विस्कळीत होत गेली, त्या नंतर कारखाना देशातील मोठे साखर उद्योजक झुनझुनवाला यांना भाड्याने चालविण्यासाठी दिला. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर वारणा समूहानेही काही काळ कारखाना चालविला. त्यांच्यानंतर सिद्धार्थ समूहाने काही काळ कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला होता. 

कर्जापोटी लिलाव
अखेरीस राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी कारखान्याचा लिलाव केला. मुंबईस्थित गुरू कमोडिटीज कंपनीने कारखाना लिलावात विकत घेतला. या समूहाने मोठ्याप्रमाणावर कारखान्याचा विस्तार केला आहे, त्यांनी राज्यातील विविध सहकारी बँकांकडून मोठ्याप्रमाणावर कर्जे उचलली आहेत. राज्य बँकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे लढा उभारला आहे. कोरेगावच्या स्थानिक न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचनालय अर्थात ई. डी. पर्यंत त्यांनी धाव घेतली आहे. आजही त्यांचा लढा कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना शेतकऱ्यांच्या स्वमालकीचा करण्याचा त्यांचा या वयातही निर्धार कायम आहे.

 

Web Title: ‘Jarandeshwar’ has been in court controversy since the beginning, ajit pawar in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.