लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा १५ जूनपर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊन करूनही जर कोरोनाची साखळी तुटत नसेल तर मानवी प्रगतीला आणि सर्वसामान्याच्या जगण्याच्या अधिकाराशी सरकार का खेळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पुसेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख राम जाधव यांनी व्यक्त केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. बारा बलुतेदार समाजव्यवस्थेतील अनेक पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचे लहान-मोठे व्यवसाय मोडकळीस आले आहेत, तर काही कायमचे बंद झाले. आर्थिक घडी पूर्णत: विस्कटल्याने अनेक व्यावसायिक, दुकानदार व सर्वसामान्य नागरिक कोरोनापेक्षा महाभयंकर संकटात सापडले आहेत. सर्व लहान-मोठ्या बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना शेती विकताही येत नाही.
आज जीवनावश्यक किराणा, भाजीपाला, कृषी बंद ठेवून सरकारला काय साध्य करायचे आहे? पोलीस, महसूल प्रशासन जनतेची पावलाेपावली अडवणूक करून या संकटात छळ करत आहेत. या नकारात्मक वातावरणात सरकारविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनबाबत फेरविचार करावा, अशी मागणी राम जाधव यांनी केली आहे.