कऱ्हाड : ईडब्ल्यूएस ही सवलत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्व प्रवर्गांसाठी असून, मराठा समाज हा त्यातील केवळ घटक आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून, आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रमुखांनी याबाबत तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
कऱ्हाड येथे बुधवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ईडब्ल्यूएस ही सवलत केवळ मराठा समाजासाठी नाही. सर्व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांसाठी ही सवलत आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा मुद्दा आणि ही सवलत या दोन वेगळ्या बाबी आहेत. या सवलतीत मराठा समाज हा केवळ घटक आहे. मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही. सध्या मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि पदोन्नती या संदर्भात राज्य सरकारच्या प्रमुखांनी तातडीने मार्ग काढला पाहिजे. अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्वपक्षीय आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. मात्र, असे असतानाही सर्वाेच्च न्यायालयात आरक्षण का टिकले नाही? राज्य सरकार कोठे कमी पडले आहे का? काही त्रुटी राहिल्या आहेत का? या संदर्भाने सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा करत आहोत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण दिले, त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. राणे समितीतही आम्ही काम केले आहे. त्या आरक्षणात थोडा बदल करून देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले. त्यानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले. येथील न्यायाधीशांच्या बेंचने मराठा आरक्षण रद्द केले. त्यावर घटनात्मक, कायदेशीर काय तरतूद करता येतील, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्याला वेळ लागत असेल तर दरम्यानच्या काळात मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी, शैक्षणिक सवलतीसाठी दुसरी काही पर्यायी व्यवस्था करता येईल का, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.
फोटो : ०२केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड येथे बुधवारी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली.