मसूर : मसूर येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सोयीनियुक्त ३० बेड्सच्या उभारलेल्या कोविड विलगीकरण कक्षामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊन गावचे आरोग्य चांगले राहील,’ असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
मसूर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात उभारलेल्या कोविड विलगीकरण कक्षाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते, तर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सचिव संगीता साळुंखे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तहसीलदार अमरदीप वाकडे, लालासाहेब पाटील, डॉ. रमेश लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘कोरोनासारख्या महामारीचे दु:ख लोकांनी घरच्या घरी सोसले. यापुढे लोकांनी थोडा त्रास होत असला तरी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे व कोरोनावर मात करावी.’ यावेळी सभापती मानसिंगराव जगदाळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, संगीता साळुंखे आदींनी मार्गदर्शन केले.
(कोट)
कोरोना काळात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे फिल्डवर जाऊन काम करत आहेत. बहुतांशी पदाधिकारी हे ४५ वयाच्या आतील आहेत. त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शासनाने फ्रंटवर्कर यादीत समावेश करून लसीकरण द्यावे.
-पंकज दीक्षित, सरपंच, मसूर
३०मसूर
मसूर येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे लोकार्पणप्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सभापती मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.