मायणी : येथील ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरमध्ये असणारे रुग्ण रात्रीच्या वेळी निघून गेले. या सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे की स्थानिक राजकारण, याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
याबाबत माहिती अशी की, मायणीसह परिसरामध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. शासनाने दोन दिवसांपूर्वी नवीन नियमावली जाहीर करून गृह अलगीकरणात असलेल्या सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर येथील आरोग्य विभागातील पदाधिकारी, कोरोना कमिटी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपंचायतीमार्फत सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण ठेवण्याचा निर्णय घेतला.
मायणी गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुमारे सत्तरच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांना येथील ग्रामपंचायतीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यापैकी फक्त नऊच रुग्ण दोन दिवस येथील कोरोना आयसोलेशन सेंटरमध्ये होते. इतर रुग्णांना आयसोलेशन सेंटरमध्ये आणण्यात प्रशासनाला अपयश आले की, रुग्ण आणण्यामध्ये राजकारण आडवे आले, हे मात्र कळू शकले नाही. याठिकाणी कोणत्याही प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याचे कारण पुढे करून याठिकाणी दाखल असलेले रुग्णही रात्रीच्या वेळी आयसोलेशन सेंटरमधून निघून गेले. सकाळी रुग्ण निघून गेल्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये सुरू झाली. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आयसोलेशन सेंटरसाठी असणाऱ्या सर्व प्राथमिक सोयी-सुविधा याठिकाणी पुरविण्यात आल्या होत्या तरीही रुग्ण निघून का गेले हे समजले नाही.
चौकट
एकत्र कुटुंबपद्धती व लहान घरे असल्याने तसेच घरातील कामांसाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या घरातील इतर व्यक्ती बाजारपेठेत खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी स्वतःहून संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
एक कोट येणार आहे...
मायणी ग्रामपंचायतीतर्फे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू केलेल्या याच आयसोलेशन सेंटरमधून रुग्ण निघून गेले. (छाया : संदीप कुंभार)