सातारा : कोरोनाला हरवण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा झाडांच्या माध्यमातून मुबलक प्रमाणात मोफत होत असतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची नितांत गरज असून, वृक्षांचे हे महत्त्व सर्वांनीच समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले.
सातारा येथील ध्यास फाउंडेशनच्या वतीने सिटी प्राइड, मोळाचा ओढा व योगेश्वर कॉलनी येथे आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पाटील, शरोफोद्दिन शेख, कृष्णा ओतारी, सुरेश रूपनवर, नारायण वडेर, गणेश तारू तसेच सिटी प्राइड व योगेश्वर कॉलनीतील रहिवासी, फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी निलमोहर, गुलमोहर, चिंच, बदाम, जांभूळ इत्यादी फळ व फुलझाडांची रोपे लावण्यात आल्याची माहिती ध्यास फाउंडेशनचे सचिव सचिन कांबळे यांनी दिली.
फोटो ओळ : सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.