मलकापूर : मलकापूरसह परिसरात शनिवारी वाऱ्यासह विजांच्या कडाकडाटात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने उपमार्ग जलमय झाले होते. वेलवर्गीय भाजीपाला पिकांसह आडसाली ऊस, उन्हाळी भुईमुगाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे, तर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीला पोषक वातवरण होणार आहे.
मलकापूर परिसरात दोन दिवसांपासूनच उकाड्यात वाढ व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली होती. दुपारनंतर पावणेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक सगळीकडे ढग दाटून आल्याने दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले होते. अचानक विजांच्या कडकडाटास सुरुवात झाली. काही क्षणातच वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते. जोरदार पावसामुळे उकाड्यापासून थोडा गारवा मिळाला. मात्र, शनिवारी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय पिकेही घेतली जातात. भेंडी, गवारी, घेवडा यासारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे पिके शेतातच पडून आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले, तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले.
चौकट..
आडसाली ऊस भुईसपाट
अनेक ठिकाणी आडसाली ऊस भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सध्या काढणी योग्य असलेले भुईमुगाचे पीक काही ठिकाणी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या अवकाळी पावसाने पेरणीपूर्व मशागतीसाठी चांगले वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
फोटो आहे...