प्रगती-जाधव-पाटील - सातारा --ळबीडच्या ताराराणी, नायगावच्या सावित्रीबाई अन् धावडशीच्या राणी लक्ष्मीबाई या माहेरवाशिणींच्या कर्तृत्वाला साजेसे काम येथील सासुरवाशिणींनी केले आहे. आरक्षणाशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवून या महिलांनी क्रांतिकारी विचारांचा वारसा जोपासला आहे. मुलींची कमी होणारी संख्या या विषयावर देश पातळीवर काम करून ‘लेक लाडकी’ अभियानाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मात्र, दारूबंदी, तंटामुक्ती आणि निर्मल ग्राम अभियानात महिलांना उल्लेखनीय काम करता आले नाही. राजकारण म्हटले की, पुरुष आणि वशिला हे समीकरण दिसते. यंदा झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरक्षणाशिवाय महिला मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या. अॅड. वर्षा माडगुळकर, रजनी पवार यांच्यासह सुमारे १७ महिलांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक प्रचार यंत्रणेत महिलांचा वावर असल्याचे चित्र दिसले. जय-पराजय याहीपेक्षा आव्हान देऊन रणांगणात झुंज देण्याची बाणेदार वृत्ती येथील महिलांनी दाखविली. मुलींची संख्या वाढविण्यासाठी कमी कालावधीत प्रभावी काम करण्याचे श्रेय अॅड. वर्षा देशपांडे यांच्या लेक लाडकी अभियानाला जाते. मुलींची संख्या कमी असणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात साताऱ्याचे नाव होते. यावर्षी एक हजार मुलांमागे ९१५ मुलींचा जन्म झाल्याचे सकारात्मक चित्र दिसते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाधिक स्टिंग करण्याचा मानही अॅड. देशपांडे यांना जातो. सुनेत्रा भद्रे यांनी अॅनिमल इक्वॅलिटी या संस्थेसाठी नेपाळमध्ये उल्लेखनीय काम केले. नेपाळमध्ये गडीमाई देवीची यात्रा दर पाच वर्षांनी भरते. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भागातून येतात. अंधश्रध्दा नसानसात भिनलेल्या येथील भक्तांशी दोन हात करत सुनेत्रा भद्रे यांनी मुक्या प्राण्यांचे जीव वाचविले. मालमत्तेसाठी महिलांचे कलह पुढे आले. मालमत्तेतून बेदखल केलेल्या वृध्दा. प्रौढ कुमारिका, विधवा यांनी वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटा घेऊन संघर्ष केल्याचे चित्र दिसले. मालमत्ता हक्काबाबत पिछाडीवर असलेल्या महिलांनाही आता अधिक समज येऊन जागरुकता झाली असल्याचे दिसत आहे. अत्याचाराचा आलेख चढताचया वर्षभरात महिलांवरील अत्याचारात कमी झाली नाही. निर्भया प्रकरणानंतर पोलीस दरबारी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसते. मात्र, यातील काही गुन्हे आकसापोटी आणि अन्य विशिष्ट हेतू ठेवून नोंदवल्याचेही समोर आले. यावर्षी दारूबंदी चळवळीला मात्र खीळ बसल्याचे दिसते. त्या बरोबरच बचत गटांचे झालेले राजकारण क्लेशकारक आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सातारा जिल्ह्याचे नाव देश पातळीवर नेणाऱ्या तंटामुक्ती आणि ग्राम स्वच्छता अभियानही यंदा सातारा जिल्ह्याला विशेष छाप टाकता आली नाही. मुलींचा जन्मोत्सव साजरा करणं, गर्भवतींचे डोहाळे जेवण करणे यांसह मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या नावाने ठेवी ठेवण्याचा अभिनव प्रयोग काही ग्रामपंचायतींनी राबविला. यामुळे मुलींच्या जन्मानंतर वाटणारे कर्तृत्वाचे ओझे हलके झाले आहे.
रणरागिणींनी जपला क्रांतिकारी वसा
By admin | Published: December 23, 2014 9:48 PM