लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरात सर्वच शासकीय कार्यालये आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी निवासी सुस्थितीतील बंगले असताना याठिकाणी संबंधित अधिकारी वास्तव्यास का राहत नाहीत. सध्या हा कळीचा व संशोधनाचा विषय ठरत आहे. तर याठिकाणी वास्तव्यास न राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तरीदेखील ही वास्तू संबंधित अधिकाऱ्यांना ‘रावसाहेब या बंगल्यात मुक्कामाला या, अशी आर्त हाक देत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, येरळवाडी मध्यम प्रकल्प आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील पंचायत समिती कार्यालय आदी अधिकाऱ्यांना वडूज शहरात सुसज्ज व सुस्थितीतील निवासी इमारती आहेत. याबरोबरीने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनासुद्धा राहण्यासाठी अनेक घरे कित्येक वर्षे पडून आहेत. या बंगल्यात व घरात आजअखेर कोणीच वास्तव्यास नसल्याने या इमारती धूळ घात आहेत. तर याठिकाणी अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वीपासून या परिसरातून महिला व शालेय विद्यार्थी दिवसा जाण्यापासून ये-जा करताना घाबरत आहेत. शासनाने या इमारतीसाठी कोट्यवधी खर्चून प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासी सोय केली असताना इतर ठिकाणी राहण्याचा बालहट्ट का, हा विषय सध्या संशोधनाचा ठरत आहे. तर यापूर्वी याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळेच अनुभव आल्याच्या सूचनाही संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने या २१ व्या शतकातील अधिकाऱ्यांना नेमके काय म्हणावे, हेच तालुक्यातील नागरिकांना समजेनासे झाले आहे. तर सध्या खटाव तालुक्याचे तहसीलदार वडूज सोडून औंध विश्रामगृहात वास्तव्यास असल्याचे खुशामदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.
वास्तविक पाहता संबंधित कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर निवासी बंगला व घरे असताना इतर ठिकाणी राहण्याचे नेमके कारण काय? असा सवाल जनसामान्य जनतेला पडला आहे. या सर्व कार्यालयामध्ये तहसीलदार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे, तसेच महसूल विभागातील कर्मचारी वास्तव्यास नसल्याने या इमारती धूळ खात असून, कित्येक वर्षे याठिकाणी गैरप्रकार होत आहे. त्यामुळे संबंधित विभाग याठिकाणी येत नसेल तर संबंधित जागा मूळ मालकांना परत द्याव्यात, अशी चर्चा करणारा एक वर्गही निर्माण झाला आहे.
--------------------------------------
चौकट
बंगल्याबाबत अंधश्रद्धा
इथे येणारे अधिकारी यांची निवासी सोय असतानादेखील वास्तव्यास येण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या कारणांचा नेमका उलगडा होत नाही; मात्र याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांमागे अनिष्ठ प्रकार घडतात, ही अंधश्रद्धा त्या अधिकाऱ्यांत फोफावत आहे; मात्र याला अपवाद ठरले ते तत्कालीन तहसीलदार विवेक साळुंखे. हे त्यांच्या कार्यकाळापर्यंत विनातक्रार वास्तव्यास राहिले.
०२वडूज
फोटो : वडूज येथील रंगरंगोटी केलेले तहसीलदार निवास. ( छाया : शेखर जाधव )
-------------------------------------------