कराड : गत वर्षभरापासून राज्यात कोरोना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफी द्यावी. तसेच छोटे उद्योजक, व्यावसायिकांना लाखापर्यंत मदत करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून, या काळामध्ये शेतकरी, व्यावसायिकांना प्रतिकूल परिस्थितीत मदतीची गरज आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे, छोटे उद्योजक, व्यावसायिकांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्वांना लाभ मिळावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची माफी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
या मागण्या मान्य न झाल्यास लाॅकडाऊन उठल्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन नलवडे यांनी दिला आहे.