वायचळवाडी-कुंभारगाव येथील युवक अनिल हे मुंबईत अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लांटवर कंपनीचे काम सुरू असल्याने अनिल त्याठिकाणी ड्युटीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांचे इतर सहकारीही कार्यरत होते. चक्रीवादळाबाबत त्यांना संदेशही देण्यात आला होता. मात्र, ते थांबलेले बार्ज मजबूत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांना वाटले नव्हते. सोमवारी, दि. १७ मे रोजी अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे अनिल यांच्यासह त्यांचे सहकारी थांबलेल्या बार्जमध्ये पाणी घुसले. परिणामी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना लाइफ जॅकेट्स घालून पाण्यात उड्या घ्याव्या लागल्या. त्याबाबतच्या सूचनाही त्यांना मिळाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. समुद्रात उंच लाटांचा सामना करीत नऊ तास ते पाण्यावर तरंगत राहिले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नौदलाचे पथक त्याठिकाणी पोहोचले. या पथकाने बोटीतून त्यांना किनाऱ्यावर आणले. अनिल वायचळ हे घणसोली येथे राहत असून संकटातून सुखरूप घरी परतल्यानंतर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
फोटो : २२केआरडी०७
कॅप्शन : वायचळवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील अनिल वायचळ हे घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.