सातारा : जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेवेळी अनेक परीक्षार्थींना ‘वेळेत आला नाही’ असे कारण पुढे करून शनिवारी हाकलून देण्यात आले होते; मात्र दुसऱ्या दिवशी रविवारीही परिचर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेवेळीही परीक्षा केंद्राचे पत्ते चक्क चुकीचे छापल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, रविवार, दि. २९ रोजी दुपारी दोन वाजता परिचर या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनाने परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा छापल्याने अनेक विद्यार्थ्यांना केंद्र सापडले नाही. प्रवेश पत्रावर भारतमाता विद्यामंदिर कोडोली सातारा-रहिमतपूर रोड हा पत्ता छापण्यात आला आहे. परंतु वास्तविक खरा पत्ता शिवराज पेट्रोलपंपाजवळ हुंडाई शोरूमच्या पाठीमागे भारत विद्यामंदिर असा होता. त्यामुळे विद्यार्थी या पत्त्यावर पोहोचले; परंतु तेथे त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. तेथील केंद्र प्रमुखांशी विद्यार्थ्यांनी चर्चा केली. ‘परीक्षेला बसू द्या,’ अशी विनंतीही केली; पंरतु त्यांना परीक्षेला बसू दिले गेले नाही. या परीक्षेसाठी नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, धुळे, कऱ्हाड, पाटण आदी जिल्ह्यांतून व शहरातून मुले-मुली परीक्षेसाठी आली होती. जिल्हा परिषदेच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे फटका बसला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आमच्या या नुकसानास जबाबदार कोण? असाही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा परीक्षा पुन्हा घ्यावी, अशीही मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)एवढ्या लांबून आम्ही सकाळीच साताऱ्यात पोहोचलो. पत्ता विचारात परीक्षा केंद्रावर पण गेलो; मात्र परीक्षेची वेळ झाल्यानंतर आम्ही प्रवेश पत्र दाखविले असता त्यावरील पत्ता चुकीचा होता. यामध्ये आमची काहीही चूक नसताना आम्हाला विनाकारण परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.- सखाराम लोखंडे, नांदेड
दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी परीक्षेला मुकले
By admin | Published: November 29, 2015 11:21 PM