मुंबई : मराठवाडा, विदर्भ भागांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसाहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची गुरुवारी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळात शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मोजुमदार, झियांग वाँग या सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, ‘बेस्ट’चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, आदी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. याचा शेतीला फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे ५००० गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचे साहाय्य लाभले असून, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वितेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यावरही झाली चर्चा या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषिक्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रिक बसेस यांबाबत चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकासकामे सुरू असून, त्याद्वारे क्षमताबांधणीस मदत होत आहे. भविष्यातही विविध क्षेत्रांतील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.