सातारा : कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या महामारीपासून सुटका करण्यासाठी हजारो नागरिक जिल्हा रुग्णालयात जात आहेत. त्यामुळे तेथे गर्दी होत असून, प्रशासनावरही ताण येतोय. त्यामुळे ग्रामपंचायतस्तरावरच लसीकरण करावे,’ असे आवाहन श्री बालाजी मित्रसमूह सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यजित चावरे यांनी केले.
चावरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग कमी जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, स्वच्छता ठेवणे, सुरक्षित अंतर, लसीकरण घेणे आदी गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत. जिल्हा पोलीस दलाला सहकार्य झाले पाहिजे. जिल्हा आरोग्य विभाग, शासकीय यंत्रणांवर कामाचा ताण जास्त आहे. ते टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे.