सातारा : लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना तहान लागल्यानंतर दररोज शेकडो प्रवासी बसस्थानकातील पाणी पिऊन तहान भागवतात; पण प्रवाशांनो सावधान... कारण सातारा बसस्थानकातील टाकीत पाणीपुरवठा होत असलेल्या भूसमान टाकीत गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्या अन् माती मिश्रित पाणी जात असून, ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या थांबतात. त्या ठिकाणी सुमारे तीस ते चाळीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची साठवण टाकी आहे. ही टाकी खूप जुनी आहे. या टाकीत जीवन प्राधिकरणामार्फत नळाद्वारे पाणी सोडले जाते. या टाकीतूनच पाणी उचलून पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सोडले जाते. या टाकीची दुरवस्था झाली आहे. टाकीकडेला मातीचा थर साठला आहे. अनेक प्रवासी तंबाखू, गुटखा खाऊन या टाकीवरच थुंकत आहेत. त्याचप्रमाणे रात्री दारू पिऊन बाटल्या टाकीत तसेच कडेला टाकतात. तर अनेकजण टाकीच्या कोपऱ्यात नैसर्गिक विधी उरकतात. टाकीला दोन ठिकाणी झाकणे आहेत. त्यातील एक कायम झाकलेले तर दुसरे सिमेंटच्या पत्र्याने झाकले आहे. त्याचपद्धतीने जलवाहिनीसाठी मोठे छिद्र तयार केले आहे. यामधून पावसाचे पाणी, तसेच माती, दारू, गुटखा, तंबाखू मिश्रित पाणी जाते. अन् तेच पाणी पुन्हा टाकीतून प्रवासी पितात. त्यामुळे ही टाकी बंदिस्त करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी) टाकीत माती अन् प्लास्टिक कागद या टाकीची पंधरा दिवसांपूर्वीच स्वच्छता केली. त्यावेळी टाकीतून मोठ्या प्रमाणात माती, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कागदाबरोबरच चुन्याच्या डब्याही आढळल्या. त्यामुळे त्यातील पाणी आरोग्याला अपायकारक असल्याचे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. टाकी लवकरच बंदिस्त करणार टाकीवरील दोन्ही झाकणे तयार असून, ते बसविले जाणार असून, टाकी भोवती पत्रा मारून ती बंदिस्त केली जाणार आहे, अशी ग्वाही राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.