खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. तालुक्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या साडेआठ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तालुक्यात सध्या ७५९ रुग्ण पॉझिटिव्ह असून ते विविध ठिकाणी अद्यापही उपचार घेत आहेत. प्रशासनाच्या दक्ष कारभारानंतरही केवळ नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा तालुक्याभोवती आवळलेला फास कधी सुटणार, याबाबत चिंतेचे वातावरण आहे.
सरकारच्या लॉकडाऊननंतरही नियम व निर्बंध पाळणे लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अजूनही ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या ८,४२५ पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात लोणंद येथील चार रुग्णालये, खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय व शिरवळ येथील दोन रुग्णालयांत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. तालुक्यात शिरवळ, लोणंदसह पिंपरे, मोर्वे, पाडेगाव, अहिरे, केसुर्डी, शिंदेवाडी, पळशी या गावातून रुग्णसंख्या अधिक असून येथे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
खंडाळा व लोणंद नगरपंचायत क्षेत्रात प्रशासनाने नियम काटेकोर करून मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. याशिवाय तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक सर्वाधिक बाधित गावात जाऊन जनजागृती करीत आहेत. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे. तर प्रत्येक जिल्हा परिषद गटात दक्षता पथक नेमले आहे. तरीही लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे बंधनकारक करायला हवे.
चौकट..
आजपर्यंत १८२ जणांचा मृत्यू...
तालुक्यात कोरोना बाधितांची संख्येपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ३,२८२ रुग्णांपैकी ३५८, लोणंद केंद्राअंतर्गत ३,१२७ रुग्णांपैकी २०४ तर अहिरे केंद्रातंर्गत २,०१९ रुग्णांपैकी १९७ अशी एकूण ८,४२५ पैकी ७५९ जण पॉझिटिव्ह संख्या आहे. तर ७,४८७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५३ रुग्ण दवाखान्यात, २५९ संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर २२७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तर तालुक्यात आजवर १८२ जणांचा मृत्यू झाला आहे.
(चौकट..)
प्रत्येक गावात लसीकरण मोहीम रावबा...
तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे तर इतर उपकेंद्रामध्ये आठवड्यातून एकदा लसीकरण केले जाते. मात्र, लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याचा वेग वाढविणे सहज शक्य आहे. प्रत्येक गावात स्वतंत्र लसीकरण मोहीम राबविल्यास गर्दी कमी होईल आणि लसीकरणात सुरळीतपणा येऊ शकतो.