मेहरून नाकाडे --- रत्नागिरी भारतातील अनेकजण आखाती देशांमध्ये नोकरीसाठी गेले आहेत. मजुरांपासून विविध उच्चपदांवर भारतीय नागरिक कार्यरत आहेत. सौदी अरेबियासारख्या देशात कच्च्या तेलाच्या किंमती गडगडल्याने तेथील शासनाने प्रशासनावरील खर्च कमी केला आहे. तसेच ‘निताहत’ कायदा लागू केल्यामुळे अन्य देशांमधील कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.भारतीयांवर आलेल्या बेकारीच्या कुऱ्हाडीनंतर भारत सरकारने या देशांमध्ये बेरोजगार झालेल्या भारतीयांना परत आणण्याचे ठरविले आहे. मात्र, रोजगारच गेल्याने स्वत:बरोबर कुटुंबियांच्या काळजीने हे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक तर अल्पवेतनावर मिळेल तो तात्पुरता रोजगार करीत आहेत. भारतीय तसेच अन्य देशांमधील नागरिकांना दिलेल्या पगाराच्या रकमेपेक्षा कमी पगारात स्थानिक कर्मचारी उपलब्ध होत असल्याने आता परदेशापेक्षा स्थानिकांना येथील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळू लागले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता आखाती देशांमधील महिला व पुरूषांमधील शिक्षणाचे वाढते प्रमाण व प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची तयारी ही सुध्दा भारतीय तसेच अन्य परदेशी मंडळींना कामावरून कमी करण्याची महत्त्वाची कारणे आहेत.परदेशात नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांसाठी शासनाने निश्चित धोरण बनविण्याची आवश्यकता आहे. एखादे विमा संरक्षण असेल तर कठीण समयी समस्याग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांना काहीअंशी दिलासा मिळेल. नोकरी व शिक्षणाच्या हेतूने परदेशात जाणाऱ्यांसाठी कायदे करतानाच कामासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठीही विशिष्ट नियमावलीची आवश्यकता आहे. जेणेकरून भारतीय नागरिकांना काहीअंशी तरी दिलासा मिळेल, असे मत आता या नागरिकांमधून व्यक्त होऊ लागले आहे.गेली चौदा वर्षे संयुक्त अरब अमिरातमध्ये मी कार्यरत आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे मी कॅटरिंग व्यवसायात नोकरी करीत आहे. अनुभवाने मला ‘शेफ’चा दर्जा मिळाला आहे. कामाबद्दल कंपनीने माझा गौरव केला. उत्कृष्ट कामाचे प्रशस्तीपत्रक, भेटवस्तूदेखील मला मिळाली. परंतु, ‘शेफ’ची शिक्षणातील पदवी माझ्याकडे नाही. दोन वर्षानंतर दोन महिन्यांची सुटी मिळते. अडीच वर्षाच्या सुटीनंतर गावी आलो. सुटीनंतर पुन्हा संयुक्त अरब आमिरातमध्ये पोहोचलो. परंतु, तेथे पोहोचल्यावर मला वेगळाच अनुभव आला. कंपनी व्यवस्थापकाने सध्या काम नसल्याचे सांगितले. कंपनीची कंत्राटे कमी झाल्याने अनेक लोक बसून असल्याचे सांगितले. कर्मचारी निवासस्थानात कित्येक मंडळी बेरोजगार असलेली दिसून आली. मी देखील दोन आठवडे बसून काढले. मात्र, दोन आठवड्यानंतर मला तात्पुरते काम देण्यात आले. माझ्या नोकरीवर माझी पत्नी, शिक्षण घेत असलेला मुलगा अवलंबून असल्यामुळे मी ती पर्यायी नोकरी स्वीकारली आहे. माझ्याप्रमाणे कित्येक मंडळी बसून राहण्यापेक्षा तात्पुरता रोजगार स्वीकारत आहेत. कारण भारतात परतल्यानंतरदेखील पुन्हा रोजगाराचा प्रश्न उद्भवणार आहे. उच्चशिक्षितांसाठी चांगले दिवस असले तरी अल्पशिक्षितांसाठी मात्र परदेशी नोकरीत अवघड दिवस आले आहेत.- यु. एच. काझी, संयुक्त अरब आमिरात.अनेक भारतीय अडकलेअल्पशिक्षित मजूर, कामगार मंडळींचा रोजगार धोक्यात आला आहे. सौदी अरेबियात सध्या दहा हजार भारतीयांचा रोजगार संपुष्टात आला असून, रोजगाराअभावी उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. अनेक भारतीयांकडे परतण्यासाठी तिकीटाला पुरेसे पैसे नसल्यामुळे ते अडकून पडले आहेत. पुन्हा भारतात येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असून, केवळ तिकीट नसल्याने त्यांना मायदेशी परतणे शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यांच्या मदतीला भारत सरकारने धावून जाणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.काय आहे ‘निताहत’ कायदा?स्थानिकांना काम देण्याचा कायदा (निताहत) सौदी अरेबिया सरकारने केला असल्याने भारतीय तसेच अन्य देशांमधील कामगारांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी तात्पुत्या स्वरूपात काम दिले जात आहे. सौदी अरेबियाप्रमाणे संयुक्त अरब अमिरात व कतारसारख्या देशातही हा कायदा लागू करण्यासाठी तेथील सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे या ठिकाणच्या भारतीय तसेच अन्य देशातील मंडळींची नोकरी धोक्यात आली आहे. सौदी अरबमध्ये १९ लाख तर संयुक्त अरब अमिरातमध्ये ३५ लाख भारतीय विविध ठिकाणी सेवेत आहेत. भरपूर पगाराच्या आमिषाची भूरळ असल्यामुळेच अनेक भारतीय नागरिक तेथे कार्यरत आहेत. शिक्षणाचा अभाव असलेले अनेक भारतीय नागरिक बांधकाम तसेच अन्य व्यवसायातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षित, उच्चशिक्षित मंडळी मात्र चांगल्या हुद्यांवर कार्यरत आहेत.
लेखा परीक्षणात पुन्हा अपहार उघड
By admin | Published: September 08, 2016 11:57 PM