महादेव भिसेआंबोली: आंबोली येथे काल, गुरूवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळत होता. यामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बेळगाव-सावंतवाडी महामार्ग बंद केला होता. आंबोली घाटातील धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती.या ढगफुटी सदृश्य पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने माडखोल विलवडे सह बांदा येथे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आंबोली धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन त्याचे सर्व पाणी मुख्य मार्गावर आल्याने पाण्याचा प्रवाह मोठा होता. याची भीती छोट्या छोट्या वाहनांना होती, पण पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीने दुर्घटना टळली.
आंबोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, बेळगाव-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक थांबवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 11:17 IST