- वैभव देसाईकणकवली मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला अन् नितेश राणेंनी विजयाचा गुलाल उधळला. गेल्या अनेक दिवसांपासून कणकवली हा मतदारसंघ राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना पक्षात घेऊन भाजपानं उमेदवारी दिल्यापासून या मतदारसंघात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या. कणकवली मतदारसंघावरूनच युतीमध्ये मिठाचा खडा पडला. राज्यात शिवसेना-भाजपाची महायुती असतानाही भाजपाच्या हक्काच्या मतदारसंघात फक्त राणेंना विरोध करण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार दिला. विशेष म्हणजे शिवसेनेनं दुसरा तिसरा कोणी नव्हे, तर जो गेल्या 25 वर्षांपासून राणेंची सावली बनून वावरत होता, सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या सतीश सावंतांनाच फोडून राणेंच्या विरोधात उभे केले. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघात नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली. कारण ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं संदेश पारकर आणि अतुल रावराणेंसारखे राणेविरोधी गटही सक्रिय झाले. संदेश पारकर यांना भाजपानं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी बंडखोरी केली. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कणकवली मतदारसंघात चुरस आणखीच वाढत गेली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे संदेश पारकर आणि अतुल रावराणे गटानं सतीश सावंतांचा प्रचार केला. संदेश पारकर, अतुल रावराणे, संदेश पटेल, वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे या चौघांची पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. कालांतरानं त्यांना शिवसेनेनं काही आश्वासनं दिली. या नेत्यांसह शिवसेनेनं सगळी ताकद पणाला लावून सतीश सावंतांचा प्रचार केला. सतीश सावंतांनी मातोश्रीच्या फेऱ्या मारून शिवसेनेची उमेदवारी मिळवली आणि त्यानंतर राणेंचे एक एक सहकारी आपल्या कंपूत घेण्याचा कार्यक्रम सुरू केला. एकेकाळी राणेंचे कट्टर समर्थक राहिलेल्या दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण यांनी सतीश सावंतांबरोबर शिवसेनेत प्रवेश केला. सतीश सावंत हे गेल्या 25 वर्षांपासून सिंधुदुर्गाच्या राजकारणात सक्रिय होते. राणेंचे विश्वासू असतानाच त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी दांडगा जनसंपर्क ठेवला. सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या सावंतांनी खेडोपाडी जाऊन जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. सहकारी संस्था आणि या क्षेत्रातील दांडग्या अनुभवाचा सावंतांनी पुरेपूर वापर केला. पण तरीही त्यांना या लढतीत विजय संपादन करता आलेला नाही.
शिवसेनेचं चक्रव्यूह भेदून नितेश यांनी सिद्ध केली कणकवलीतील 'राणेशाही'!
By वैभव देसाई | Updated: October 25, 2019 18:27 IST