सोलापूर - सोलापूर शहरातील जगजीवन राम नगर मोदी परिसर येथे राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. आणखीन दोन मुलं गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटी याचा त्रास सुरू झालेला आहे. दुषित पाण्यामुळे त्या मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे. ड्रेनेजचेंबर मधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच आ. देवेंद्र कोठे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी नगरसेवक किसन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी चौकशीचे आदेश दिले.