उल्हासनगर : महापालिकेच्या जकात विभागाची जुनी महत्त्वाची कागदपत्रे पूर्णत: भिजलीआहेत. लेखापरीक्षण व वर्गीकरणापूर्वी ती भिजल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या प्रकाराच्या चौकशीची मागणी होत आहे. तसेच इमारत म्हणजे मद्यपींचा अड्डा बनला आहे. येथे असलेल्या बालविकास प्रकल्प विभागाच्या महिला कर्मचारी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या प्रकाराला कंटाळून प्रकल्प अधिकारी राहुल मोरे यांनी कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतला आहे.उल्हासनगर मनपाने जकातीची कागदपत्रे तरणतलावाशेजारील इमारतीत ठेवली होती. रेकॉर्ड रूमशेजारीच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व पहिल्या मजल्यावर दुकान निरीक्षक विभागाचे कार्यालय आहे. जकातीसह एलबीटीची कागदपत्रे येथे ठेवल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. जकात व एलबीटीतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून कागदपत्रे नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचा संशय नगरसेवक सुभाष मनसुलकर यांनी आयुक्तांकडे व्यक्तकरून चौकशीची मागणी केली आहे.कागदपत्रे भिजल्याने दुर्गंधी पसरली आहे. सर्वाधिक त्रास शेजारी असलेल्या बालविकास प्रकल्प कार्यालयातील महिलांना होत आहे. दोन महिन्यांपासून ताप,कावीळ यांनी ग्रासले आहे. पाण्याचा अभाव व स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय होत असल्याची माहिती वरिष्ठ लिपिक आशा धांडे, मुख्यसेविका जीया कोटे, वैभवी मयेकर, अरुणा कालेकर, अस्मिता मोरे, संगीता शिंपी यांनी दिली. पालिकेकडे सुविधेची मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. रात्रीच्यावेळी कार्यालयाच्या प्रांगणात मद्यपींचा अड्डा असतो. सकाळी मद्याच्या बाटल्या आम्हाला काढाव्या लागतात, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जकात कागदपत्रे भिजली
By admin | Published: August 12, 2016 2:11 AM