लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पूर्वेतील द्वारली गावच्या रस्त्याचे डांबरीकरण शनिवारपासून सुरू झाले आहे. या रस्त्यासाठी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. कामास प्रांरभ झाल्याने त्यांनी मनपाचे जाहीर आभार मानले आहेत.
द्वारली गावच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. धुळीचे साम्राज्य, वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले होते. त्यामुळे तेथे चांगला दर्जेदार रस्ता व्हावा, यासाठी पाटील चार ते पाच वर्षांपासून केडीएमसीकडे पाठपुरावा करत होते. त्यासाठी त्यांनी वारंवार निवेदने, पत्रे दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी रास्ता रोको व जनआंदोलनाचा इशारा देताच मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे आदेश दिले होते. त्यामुळे शनिवारपासून तातडीने रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
‘मी जनसेवक असून, माझी बांधीलकी जनतेशी आहे. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी मला कितीही आंदोलने करावी लागली तरी चालेल, पण मी जनतेची होणारी परवड सहन करणार नाही. प्रभागातील नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास माझ्याशी संपर्क साधावा’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
------------------