- नितीन पंडितभिवंडी - शहरालगतच्या राहनाळ गावाच्या हद्दीतील अंजुरफाटा येथे वसई दिवा या रेल्वे लाईनच्या चौपदरी करणाचे काम सुरू असून त्यासाठी खोल खड्ड्यात काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असून त्याठिकाणी सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका कामगाराचा काँक्रिट भिंती खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.कमल्या जयराज वालकुभाई वय २२ असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे हे काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या वतीने माया एंटरप्रायजेस ही कंपनी करीत असून काँक्रिट ची संरक्षक भिंत उभारली जात असताना काँक्रिट भीम क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात उतरवले जातात.ते उतरवले जात असताना एका काँक्रिट भीम चा काही भाग क्र्याक झाल्याने क्रेन मधून निसटला.त्यावेळी खाली खड्ड्यात उभ्या असलेल्या कमल्या जयराज वालकुभाई यांच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नारपोली पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी कामगारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.या प्रकरणी नारपोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अपघाताची चौकशी करून त्यास जबाबदार असलेल्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.