डोंबिवली : प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत, एकत्र येणे हे मला जास्त गरजेचे वाटते, असे मत व्यक्त करतानाच सुप्रसिद्ध उद्योगपती व ‘विको’चे संजीव पेंढरकर यांनी, ब्राह्मण समाजाने मारवाडी आणि गुजराती यांचा आदर्श ठेवावा, असा मोलाचा सल्ला दिला आहे.ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासाकरिता सुरु असलेल्या एकत्रिकरणाबाबत पेंढरकर यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपली भूमिका एकांगी असू नये. बुद्धी कौशल्यावर भर देऊन त्या व्यक्तीस सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी एकत्र यावे, यात दुमत नाही. सर्वत्र समानता आणण्यासाठी निसर्गाने मानवाची निर्मिती केली आहे, याचे विस्मरण होऊ न देता एकत्रिकरण होणे, हे कधीही चांगलेच आहे. आपल्या मनातील वेदना आणि वास्तव मांडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असले तरी तो मार्ग मात्र विधायक असायला हवा.’पेंढरकर पुढे म्हणाले की, ‘गरीब मग तो कुणीही असो, त्याच्याकडे कौशल्य आहे, पण त्याला जर मजबूत हातांची आवश्यकता असेल, तर तो देण्यासाठी जे काही करण्यासारखे आहे, ते जरूर करावेच. पण त्यासाठी कुठलीही बंधने असायला नकोत. दुसरे म्हणजे केवळ नोकरीच्या मागे न लागता तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी काही ध्येयधोरणे राबवावी. त्यासाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, त्या जरूर करून द्याव्यात. ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना राबवल्यास आपले परकीय चलनही वाचेल आणि जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) वाढेल. मात्र, त्यासाठी काही उपाययोजना जसे बँक कर्ज, सहजतेने कर्ज, परवाना या गोष्टींसाठी जाणत्या व्यक्तींनी समाजाला जरूर मदत करावी. जेणेकरून त्या व्यक्तींचा आत्मविश्वास उंचावेल आणि त्यांच्याकरीता पुढील वाटचाल सुकर होईल’. (प्रतिनिधी)
ब्राह्मणांनी मारवाडी, गुजरातींचा आदर्श ठेवावा
By admin | Published: October 04, 2016 2:30 AM