ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी केंद्र बंद होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील लसीकरण मोहीम ठप्प होती. तर ठाण्यातही ५६ पैकी केवळ ११ केंद्रावरच लसीकरण सुरु असल्याचे दिसून आले. उर्वरीत ४५ केंद्र बंद होती. जिल्ह्याच्या ठिकाणी शुक्रवारी केवळ ५० हजार २६० लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोवीशील्डचा अवघा ४१ हजार ८२० लसींचा तर कोव्हॅक्सीनचा ८ हजार ४४० लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे १ मे पासून लसीकरण कसे करायचे असा पेच निर्माण झाला आहे.
ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यासह इतर जिल्ह्यातील इतर महापालिकांनी देखील लसींचा साठा मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यातही लसींचा तुटवडा निर्माण झाला असून अगदी कमी साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणोने दिलेल्या आकडेवारीवरुन समोर आली आहे. भिवंडीकडे कोव्हॅक्सीनचे ४५० तर कोव्हीशिल्डचे २३२० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सीनचे अवघे ९० आणि कोव्हीशिल्डचे ३ हजार ६५० डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सीनचे ५०० डोस असून कोव्हीशिल्डचे ६ हजार २८० डोस, मिरा भाईंदरमध्ये कोव्हॅक्सीनचे २ हजार ७१०, कोव्हीशिल्डचे ९ हजार ४००, नवीमुंबईतही कोव्हॅक्सीनचे १ हजार ८७० व कोव्हीशिल्डचे ५ हजार ३६० डोस शिल्लक आहेत. तर उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सीनचे ६४०, कोव्हीशिल्डचे ३ हजार ५९० डोस शिल्लक आहेत. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोव्हॅक्सीनचे २ हजार १८० आणि कोव्हीशिल्डचे ११ हजार २२० डोस शिल्लक असल्याची माहिती समोर आली. त्यातही याच शिल्लक डोसमधून शुक्रवारी लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी लसींचा साठा मिळाला नाही तर अनेक ठिकाणची लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ स्थानिक प्रशासनासमोर आली आहे.
ठाण्यात शुक्रवारी ४५ केंद्र बंदठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी शहरातील ११ केंद्र सुरु असल्याचे दिसून आले आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसत होते. परंतु टोकन नुसारच लसीकरण केले जात होते. परंतु शहरातील उर्वरीत ४५ केंद्र बंद होती.
जिल्हा रुग्णालयातही लसीकरण बंदठाणो महापालिका हद्दीतील केंद्रावर लस नसल्याने ठाणोकर जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतात. मात्र मागील तीन दिवसापासून येथील केंद्र बंदच असल्याचे दिसत आहे. लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने हे केंद्र बंद ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लस देण्याचे निश्चित झाल्याने त्यानुसार जिल्हा रुग्णालयासाठी येथे मंडप उभारण्यात आले आहेत. रोजच्या रोज १ हजार नागरीकांचे लसीकरण करण्याची त्यांची तयारी आहे. परंतु लसींचा साठाच मिळत नसल्याने लसीकरण कसे करायचे असा पेच जिल्हा रुग्णालयालाही सतावत आहे.