चिकणघर : दरवर्षी नवनवे प्रयोग करून अधिक पीक घेणारे दहीगाव येथील प्रयाेगशील शेतकरी दत्तात्रय देशमुख यांनी यंदा भातशेतीत केलेला नवीन प्रयोग बघण्यासाठी इतर शेतकरी त्यांच्या शेताच्या बांधावर येत आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात देशमुख यांनी ‘सूरज प्लस’ या नवीन भातबियाण्याची लागवड केली आहे.
आठ वर्षांपासून ते आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात दरवर्षी विक्रमी पीक घेत आहेत. भातपिकासह विविध कडधान्ये लागवडही त्यांनी केली आहे. सध्या अवजारे, बियाणे आणि मजुरी महाग झाल्याने शेती परवडणारी नसल्याचे कारण सांगून अनेक शेतकरी शेती करीत नाहीत. मात्र, देशमुख यांचे नवनवे प्रयोग शेतीला संजीवनी देणारे ठरत असल्याने त्यांची शेती पाहण्यासाठी शेतकी अधिकारी आणि आजूबाजूचे शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्या शेतावर येत आहेत. इतर शेतकऱ्यांनी आपले अनुकरण करण्याचे अवाहनही देशमुख यांनी केले आहे. २०१९मध्ये शासनाचा ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ हा पुरस्कारही देशमुखांना मिळालेला आहे.