दिवाकर गोळपकर, कोळसेवाडीकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ‘निर्मल योजनेंंतर्गत’ ज्या भागात शौचालयांची आवश्यकता आहे, अशा भागात स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत खर्च झाले आहे. केडीएमसीतर्फे मनपा क्षेत्रातसुद्धा ही योजना राबविण्यात आली. परंतु, सर्व प्रभागांतील स्वच्छतागृहांची सद्यस्थिती पाहता शेकडो कोटी रुपयांचे अनुदान मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांनी मिळून मातीत घातले आहे, असेच दिसून येते.कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ६१ मध्ये कचोरे, हनुमाननगर, नवीन गोविंदवाडी, श्रीकृष्णनगर, स्रेहवर्धकनगर, वाघचौरे चाळ, नेतिवली मनपा शाळेजवळील परिसरात सार्वजनिक शौचालये आहेत. सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या व संबंधित संस्थेच्या सहकार्याने ती चांगली चालली. परंतु, कालांतराने आर्थिक आणि व्यक्तिगत स्वार्थामुळे त्यावरचे नियंत्रण सैल झाले. हम करे सो कायदा सुरू झाला. स्वच्छतेबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले. नेतिवली टेकडीवरील वस्ती स्वच्छतागृह कौसलबानू नावाची महिला संस्था सेवा आणि उपजीविकेच्या भावनेतून चालवते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम व सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे इमारतीच्या मागील बाजूला मैला साचलेला आहे. तो वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधी व रोगट वातावरणास सामोरे जावे लागत आहे. वरच्या मजल्यावरील पुरुषांची १२ कुपे व खालच्या मजल्यावरील १० कुपे पाणीगळतीमुळे बंद ठेवली आहेत. प्रत्येक लाभार्थ्याकडून दरमहा नाममात्र पैसे घेऊन त्यातून देखभाल व स्वच्छतेचे काम केले जाते. खरे म्हणजे स्वच्छतागृहाचे सांडपाणी ड्रेनेजला जोडले जाऊ शकते, पण ते करणार कोण? थोड्या फार फरकाने सर्वच शौचालयांची अशी दयनीय अवस्था असल्याचे नागरिकांनी सांगितले.या प्रभागाची लोकसंख्या सर्वसाधारण १२, १०० आहे. कचोरेगाव, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर, स्नेहवर्धक नगर, वाघचौरे चाळ, मेट्रो मॉल परिसर, ओमकारनगर यांचा मिळून प्रभाग होतो.
‘निर्मल भारत’ अभियानाचा प्रभागात बोजवारा
By admin | Published: August 19, 2015 11:54 PM