बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील शिधा वाटप दुकानदारांच्या बायोमेट्रिक पद्धतीतील तांत्रिक अडचणी, दुहेरी हमाली मिळणे आदींसह विविध अडचणी सोडवण्यासाठी संघटना शासन दरबारी प्रयत्नशील आहे. याबाबतच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व अडचणी लवकरच दूर होतील, असे आश्वासन ठाणे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शंकर सुरोशे यांनी दिले.
रास्त भाव दुकानदारांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा रास्त भाव संघटनेचे पदाधिकारी व दुकानदार यांची विशेष बैठक कर्जत-बदलापूर हायवेवरील चामटोली येथील सुरोशे फार्महाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. भिवंडी तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, कल्याण तालुकाध्यक्ष जयराम मेहेर, मुरबाड तालुकाध्यक्ष भाई कराळे, शहापूर तालुकाध्यक्ष किरण तुपे, अंबरनाथ तालुकाध्यक्ष संतोष बैकर आदींसह ठाणे जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. शासनाने शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा घेणे बंधनकारक केले आहे. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे यात अडथळे येतात. दुकानदार व शिधापत्रिकाधारक यांचीही यामुळे गैरसोय होत आहे. त्याशिवाय शिधा वाटप अन्नधान्य वाहतूक करण्यासाठी एका बाजूचा हमाली खर्च मिळावा व गोडाऊनमधून धान्य घेताना ते वजन करून मिळावे यासह इतर अनेक अडचणी शिधा वाटप दुकानदारांनी मांडल्या. या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ठाणे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शंकर सुरोशे यांनी दिले. यावेळी ठाणे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे सेक्रेटरी विवेक बेहरे, सहसेक्रेटरी सुनील गोपाळे, उपाध्यक्ष उमाकांत पातकर, सुरेश पै, शंकर शेलार, विठ्ठल डामसे, रेखा गायकवाड, अशोक पाटील, रमेश भोईर, मारुती दळवी, भरत गोंधळी आदी उपस्थित होते.
विमा कवच मिळवण्यासाठी पाठपुरावा
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिधा वाटप दुकानदारांना विमा कवचाचा लाभ देऊन ती रक्कम त्यांच्या वारसांना देण्यात यावी, यासाठी संघटनेतर्फे शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानिमित्ताने शिधा वाटप दुकानदारांचा सत्कार करण्यात आला. स्नेहभोजनाने या बैठकीचा समारोप करण्यात आला.