रोहिदास पाटील, अनगावभिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे. वनअधिकाऱ्यांसह कर्मचारीही कार्यालयाकडे फिरकत नसल्याने वीस गावे, सहा पाड्यांच्या शेतकऱ्यांना आपल्या कामाकरिता ससेहोलपट करावी लागत आहे. तर येथील नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कार्यालयाच्या मागील बाजूस बैल बांधून गोठाच तयार केला आहे.ठाणे व भिवंडी वनविभाग यांच्या अखत्यारित पारिवली वन विभागाचे कार्यालय आहे. आदिवासींसह संमिश्र लोकवस्ती आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना वनपट्टे मिळतात. त्याची माहिती व कातकरी समाजाची जमीन नावे करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पारिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र येथे येणाऱ्या आदिवासींना कार्यालयास कुलूप बघून परतावे लागत आहे.पंधरा वर्षापासून इमारतीची दुरुस्ती न केल्याने ती कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. वनअधिकारी, कर्मचारी येत नसल्याने त्याची देखभाल होत नाही. अस्वच्छता पसरली आहे. इमारतीचे कौले तसेच दरवाजा, खिडक्या तुटलेल्या आहेत. दोन खोल्यांमधील लाद्याही तुटलेल्या आहेत. पाठीमागील खोल्याच्या मोकळ्या जागेत स्थानिकांनी एका खोलीत बैल बांधून गोठा बनविला आहे. तर दुसऱ्या खोलीमध्ये शेतीचे साहित्य ठेवले आहे. वनविभागाच्या या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये गुरांचा गोठा जर तयार होत असेल तर वनविभाग झोपा काढतोय का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. वनाधिकारी आय.एस. ठाकूर व त्यांचे सहकारी येथे फिरकत नसल्यामुळे कार्यालयाचा उकिरडा झाला आहे. शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.या इमारतीची दुरुस्ती करावी यासाठी वन विभागाने ठाणे वन विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही साधी दुरुस्तीही करण्यात न आल्याने प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभागाने या इमारतीला निधी मंजूर करुन नव्याने बांधकाम करण्याची मागणी होत आहे.
वन कार्यालय नव्हे गोठा
By admin | Published: August 17, 2016 2:20 AM